Close

जिल्हयाला “ऑरेंज अलर्ट”; अतिवृष्टीच्या दरम्यान नागरिकांनी घ्यावयाची काळजी

दिनांक 10 जून ते 12 जून, 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, याबाबत “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला आहे.

या काळात सोसाटयाचा वारा आणि अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे अचानक येणारा पूर किंवा भरतीच्या काळात अधिक पाऊस झाल्यास काही भाग जलमय होण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका संभवतो. तरी ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

1) मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये.

2) आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.

3) अतिमहत्त्वाचे काम असल्याखेरीज कुणीही घराच्या बाहेर पडू नये.

4) आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तसेच समुद्र, खाडी, नदी किनारी धोकादायक भागात / पूर क्षेत्रात असल्यास तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे.

5) आपले घर दरड कोसळण्याच्या भागात असेल / तिव्र उतारावर असेल / सैल मातीच्या भागात असेल किंवा धोकादायक धरणाच्या खालील भागात असेल तर प्रशासनाच्या सहकार्याने जवळच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.

6) घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे.

7) आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. तसेच जनावरांना कुठल्याही पध्दतीने बांधून ठेवू नये.

8) आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.

9) हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.

10) सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.

11) पिण्याचे पाणी शुध्दीकरण करुन वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे. डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी मच्छर अगरबत्ती / मच्छरदाणीचा वापर करावा.

12) ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.

13) सद्यस्थितीत जिल्हयात Covid Quarantine/ isolated असलेले नागरीक व चक्रीवादळाचे पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवतांना एकमेकांत मिसळणर नाहीत याची दक्षता घ्यावी.

14) आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.

15) मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत / तहसीलदार कार्यालय / जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02352 – 226248, 222233 वर संपर्क साधावा किंवा 7057222233 नंबरवर व्हॉटस्ॲप करावे.

(लक्ष्मीनारायण मिश्रा), जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी