Close

ऐतिहासिक व सामाजिक महत्व

रत्नागिरी हि लोकमान्य टिळकांची जन्मभूमी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असून परशुरामाची भूमी, व्याडमुनींची भूमी म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. मध्ययुगात अनेक युरोपियन प्रवाशांनी व धर्मोपदेशकांनी कोकणच्या किनारपट्टीला भेट दिली होती. प्राचीन कोकणवर मौर्य, सातवाहन, त्रैकूटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, कदंब व यादव राजवंशांनी स्वामित्व गाजविले. सातवाहनाच्या काळात पन्हाळेकाजी येथील लेणी बौद्ध धर्माच्या अध्ययनाची व प्रसाराचे केंद्र होती. रत्नागिरीचा देश-परदेशातील अन्य भागांशी समुद्रमार्गाने व्यापार झाल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पा.वा.काणे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे अशा तीन ‘भारतरत्नांची’ ही भूमी. याव्यतिरिक्त ब्रम्हदेशाचा राजा थिबा यांना तत्कालिन इंग्रज सरकारने रत्नागिरी जिल्ह्यात नजर कैदेत ठेवले होते. रत्नागिरी शहरातील थिबा राजवाडा व थिबा राजा यांची समाधीला भेट देण्यासाठी म्यानमारमधील नागरीक तसेच उच्च पदस्थ व्यक्ती वेळोवेळी भेट देत असतात. तसेच ब्रिटीश सरकारने रत्नागिरी येथे बंदिवासात ठेवलेल्या स्वातंत्रयवीर विनायक दामोदर सावरकर सारख्या महापुरुषामुळे रत्नागिरी जिल्हा पावन झाला आहे.